
मे 2008 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांनी महाराष्ट्रातील मुस्लिमांच्या सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणावर डॉ.महमूद उर रहेमान यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय अभ्यास गट गठित केला होता. डॉ.महमूद उर रहेमान आणि बाकी सहा सदस्यांनी मिळून पुढील पाच वर्षे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन,त्यांच्या सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक समस्यांवर अतिशय अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून 21 ऑक्टोबर 2013 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सादर केला.
त्या अहवालात मुस्लिम समाजातील मागासलेपणा दूर करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्वाच्या अश्या 40 शिफारशी सुचवल्या.त्यामध्ये सगळ्यात पहिली शिफारस आहे, महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला राज्याच्या शासकीय नोकऱ्यात व शैक्षणिक संस्थांमध्ये 8 टक्के आरक्षण देण्याची.
अभ्यास गटाचा अहवाल सादर केल्यानंतर डॉ.महमूद उर रहेमान ऐका ठिकाणी बोलताना म्हणाले होते…
“मी माझं काम केलं आहे.आता जर शासनाला खरोखरच मुस्लिमांचा विकास करण्याची ईच्छा असेल तर आम्ही सुचवल्या शिफारशी प्रमाणे निर्णय घ्यावे आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत ठोस पाऊल उचलावे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांनी मुस्लिम विकासासाठी 200 कोटी रुपयांचे पॅकेज देण्याबाबत विचारणा केली होती.त्यावेळी देखील आपण विलासरावांना सांगितलं की,निधी द्यायचा असेल तर द्या.मात्र त्यापेक्षा आरक्षण दिले तर मुस्लिमा मधील गरजवंतांना अधिक फायदा होईल.
मात्र समाजाचं दुर्दैव अस की आजपर्यंत मुस्लिमांना ते 8 टक्के आरक्षण मिळालंच नाही.यावरून राज्यकर्त्यांना मुस्लिम समाजाच्या विकासाची किती चिंता आहे ही गोष्ट स्पष्ट होते. याला फक्त सरकार किंवा राज्यकर्ते दोषी आहे असं म्हणून चालणार नाही.ते दोषी आहेतचं त्याबद्दल दुमत असूच शकत नाही. मात्र फक्त ते एकटे दोषी नाहीत.त्या समाजाचा हिस्सा म्हणून आम्ही देखील तितकेच दोषी आहोत.
कारण समाजाचं इतकं भीषण वास्तव आपल्यासमोर अधिकृतरित्या येऊन देखील आपण त्याची जाणीव समाजामध्ये निर्माण करू शकलो नाहीत.आपण याचं गांभीर्य समाजातील घराघरात कधी निर्माण केलं नाही. आपल्या मागासलेपणाची जाणीव आणि त्याच गांभीर्य समाजात निर्माण करायला आपण कमी पडलो आणि इथेच आपलं सर्वात मोठं नुकसान झालं.
याचा अर्थ असं नाही की, कोणी आवाजच उठवला नाही,कोणी प्रयत्नच केले नाहीत,कोणी लढायलाच उतरलं नाही…काही नावं आजही मोठ्या आदराने घ्यावे लागतील.ती यासाठी की त्यांनी त्यांच्या परीने शक्य होईल तितके प्रयत्न केले.अतिशय प्रतिकुल परिस्थितीत देखील त्यांनी लढा दिला. मात्र त्यामध्ये देखील काही गोष्टी घडल्या..तो वेगळा चर्चेचा विषय आहे.
यावरून विशेष करून, आम्हा मुस्लिम तरुणांना आपल्यावरील जबाबदारीची आणि कर्तव्याची जाणीव करून,सर्वात प्रथम आपल्यामध्ये त्याच गांभीर्य निर्माण करावं लागेल.आणि मग समाजातील प्रत्येक घराघरात त्याच गांभीर्य निर्माण करावं लागेल…!