
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणता येईल इतके मौलाना आझाद हिंदू-मुस्लिम एकतेचे पुरस्कर्ते होते.देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून जितके ते झटले झगडले तितकंच ते हिंदू-मुस्लिम एकतेसाठी झटले झगडले आहेत.
त्याहीपुढे जाऊन बोलायचं झाल्यास मौलाना आझादांसाठी देशाच्या स्वातंत्र्यापेक्षाही हिंदू-मुस्लिम एकता जास्त महत्वाची होती.कारण त्यांचा ठाम विश्वास होता की या एकतेच्या बळावर एक सक्षम राष्ट्र निर्माण केलं जाऊ शकत.
1921 मध्ये आग्रा येथे भाषण देताना मौलाना आझाद म्हणतात,
“मी स्पष्टपणे सांगतो की माझं सगळ्यात अगोरच लक्ष्य हिंदू-मुस्लिम एकता आहे.मी माझ्या मुसलमान बांधवाना सांगू इच्छितो की, त्यांनी हिंदूंच्या सोबत प्रेमाचं आणि बंधुभावाच नातं कायम करावं.केवळ याच पद्धतीने आपण एक यशस्वी राष्ट्र निर्माण करू शकतो.”
मौलाना आझादांनी कित्येक भाषणात सांगितले की,
स्वर्गातून फरिश्ते(अल्लाह चे दूत) जरी आले आणि मला त्यांनी विचारलं की तुम्ही हिंदू-मुस्लिम एकता किंवा स्वराज्य यामधून कश्याला निवडाल तर ते म्हणतात मी नेहमी हिंदू-मुस्लिम एकतेचा स्वीकार करीन.
1923 ला काँग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून भाषण देत असताना मौलाना आझाद म्हणतात,
“आज जर स्वर्गातून एखादी देवी येऊन मला म्हंटली आम्ही तुम्हाला हिंदू-मुस्लिम एकतेच्या बदल्यात 24 तासाच्या आत स्वातंत्र्य देतो तर मी त्या स्वातंत्र्याचा त्याग करणं चांगलं समजेल.”
कारण त्यांची एक सफल आणि सक्षम राष्ट्रनिर्माणासाठीची श्रद्धा ही हिंदू-मुस्लिम ऐक्यावर होती.
काँग्रेसच्या 53 व्या मार्च 1940 च्या अधिवेशनात अध्यक्ष म्हणून केलेल्या भाषणात मौलाना आझाद म्हणतात,
“मला हिंदू-मुस्लिम एकता आणि स्वातंत्र्य दोघांपैकी एक निवडायचे असल्यास मी हिंदू-मुस्लिम एकतेची निवड करीन.स्वातंत्र्य मिळण्यासाठी लागणाऱ्या वेळेमुळे आमचं थोडं नुकसान तर जरूर होईल,मात्र आमची एकता तुटली तर याचं नुकसान सगळ्या मानवजातीला सोसावं लागेल.”
स्वातंत्र्यानंतर ते मुस्लिमांना म्हणतात,
“भलेही धर्माच्या आधारावर हिंदू तुमच्यापेक्षा वेगळे आहेत मात्र राष्ट्र आणि देशभक्तीच्या आधारावर ते वेगळे नाहीत.”
मौलाना आझाद म्हणतात,
‘मैं अविभाजित एकता का हिस्सा हूं जो एकमात्र भारत की राष्ट्रीयता है’!
इतकी प्रचंड निष्ठा मौलाना आझादांची इथल्या हिंदू-मुस्लिम एकतेवर होती.त्यांचं स्पष्ट मत होत की हिंदू-मुस्लिम एकतेवर एक सफल आणि सक्षम राष्ट्र निर्माण केलं जाऊ शकत.
देशातील आजच्या परिस्थितीत जेंव्हा हिंदू-मुस्लिम एकतेत जाणीवपूर्वक दरी निर्माण केली जात आहे,द्वेषाचा माहौल बनवून त्या माध्यमातून खऱ्या भारताला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे तेंव्हा मौलाना आझादांची आठवण नक्की येते.