
महाराष्ट्रातील मुस्लिम समाज महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव पाडू शकतो. बहुसंख्य जण प्रश्न विचारतात की मुस्लिम समाजात नेतृत्व निर्माण का होत नाही?
मुस्लिम समाजात राजकीय नेत्याबरोबर काम करणारे राजकीय चेलेचपाटे हे कोणतीही राजकीय वैचारिकता नसताना सतरंज्या उचलण्याचे काम करतात. नेता हा त्यांच्यासाठी तारणहार तर असतोच पण ‘ सर्वस्व ‘ देखील असतो हे त्याच्यासाठी समाजासाठी तोंड उघडायला कधीही तयार नसतात.
दुसरे पाच लाखाचे कॉन्ट्रॅक्टर. ह्यांना वर्षातून कमीत कमी एक दोन अशी कामे मिळतात. मुस्लिम बहुल भागात अल्पसंख्याक बहुल भागात असलेली कामे. हि कामे अतिशय निकृष्ट केली जातात. किंवा कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्याचे असते त्यांनी हे काम घेतलेलं असते. अशी मंडळी समाजातून उठणारे नेतृत्व दाबण्यासाठी वाट्टेल ती भूमिका निभावत असतात.
यातून वाचलेले हे पक्षाकडून एखाद पद किंवा नगरसेवक पदासाठी तडजोडी करणारे असतात
सगळ्यात मोठा धोका ह्या मंडळींकडून असतो. वेळप्रसंगी धार्मिक उलेमा यांचा खुबीने वापर करणारी ही मंडळी असतात.
निवडणुकांच्या आधी होणारे मेळावे हे बिर्याणीसाठी असतात याचा समाजाला फायदा काय?
समाज कोणताही असो त्याचा सामाजिक ढाचा मजबूत असला की त्याचा परिणाम इथल्या व्यवस्थेवर पडतो. मुसलमानांचा सामाजिक ढाचा तेवढा आहे का मजबूत? देशाच्या राजकारणात वेगवेगळे समाज, समूदाय निर्णायक भूमिका पार पाडत असताना मुस्लिम समाज तेवढी ताकद ठेवतो का? याच उत्तर नाही असं येईल.
आधीच अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिमांची मते एक गठ्ठा असतात अशी दिशाभूल बहुसंख्यांक समाजाची केली जाते त्यापेक्षा मुसलमानांची देखील केली जाते.
नेत्यावरील निष्ठा, पक्ष निष्ठा, सामाजिक संबंध हे मुसलमानांभोवती एवढे घट्ट झालेले दिसतील ते अन्य कोणत्याही समूदायाभोवती झालेले दिसत नाहीत.
बहुसंख्याकांच्या मतांच्या निवडीच्या सत्ता संघर्षात मुस्लिम समाजाला त्याची शक्तिस्थाने माहीत आहेत का? त्याबाबत त्याची व्युव्हरचना आहे का?
निवडणुकीच्या आधी मुस्लिम समाजाला दिशाभूल करण्याचा कार्यक्रम राबवला जातो. अल्पसंख्याक सेलचा टोपी- गमजा कार्यक्रम, निवडणुका आधी बजेटची केलेली निरुपयोगी घोषणा हे हास्यास्पद असतात.

सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आता नवीन विचार सुरू आहे तो विचार राजकीय आंदोलनाचा… असलाही पाहिजे काही हरकत नाही पण निवडणुकांच्या आधी समाजाच्या होणाऱ्या बैठका, मेळावे, मोर्चे, आंदोलने हे खरेच फायद्याचे असतात का?
यंदाच्या निवडणुकांचा मौसम आणि रमजान सोबत असेल..? इफ्तार पार्टीचे पेव माजेल त्याचबरोबर सामाजिक सलोखा बिघडवणारी भाषणे, विधाने, कृती या चरम सीमेवर असतील..
मग या सर्वात समाजाची राजकीय बलस्थाने काय आहेत? एखाद्या मतदार संघात समाजाची मताची आकडेवारी किती आहे? समाजाचे प्रश्न काय आहेत? समाजाची व्युव्हरचना कशी असावी याबाबत संशोधनात्मक काम करणारी संस्था समाजात आहे का?
ऐन निवडणुकीच्या काळात विविध पक्षासाठी काम करणाऱ्या सेल मधील मंडळीचा याबाबत कधी विचार विनिमय झाला? सगळ्यात महत्वाचे जे स्वतःला नोंदणी कृत पक्ष म्हणतात त्या पक्षाच्या घटनेत अल्पसंख्याक सेल नावाचा प्रकार आणि किंवा पक्षाच्या नियमावलीत तिला स्थान नाही.
समाजाची व्युव्हरचना एखाद्या मतदार संघात काय असावी? कशाप्रकारे प्रभाव पाडू शकतो किंवा राजकीय ताकद निर्माण करावी याची समज कधीही आली नाही.
याचा परिणाम असा होतो की समाजातील अशिक्षित पणा, राजकीय निरक्षरता , उच्च शिक्षित तरुणाचा समाजाच्या जागृतिकडे असलेले दुर्लक्ष, विविध पक्षाच्या असलेल्या अल्पसंख्याक पदाधिकारी यांची भूमिका, उलेमांची भावनिक विधाने किंवा चुकीच्या भूमिका यांचा एकत्रित परिणाम मुस्लिमांच्या राजकीय कुमकुवतपणात होत असतो.