‘सहरी : पहाटेचा आहार’ रोजा ठेवणारे यांच्यासाठी महत्व काय?

रमजान महिन्यात किंवा वर्षाच्या इतर कोणत्याही दिवशी रोजा ठेवताना पहाटे काही प्रमाणात का होईना आहार घेणे उचित असते. प्रेषित मुहंमद (स.) यांच्यापूर्वीच्या पैगंबरांच्या अनुयायांवरही रोजे ठेवणे अनिवार्य केले गेले होते. परंतु अल्लाहने त्यांना पहाटे खाण्या-पिण्याची सवलत दिली नव्हती. प्रेषित मुहंमद (स.) यांच्या अनुयायांना मात्र अल्लाहने रोजाच्या दिवशी उत्तररात्रीला पहाटे आहार घेण्याची मुभा दिली आहे. पहाटेच्या म्हणजे रात्रीच्या शेवटच्या सहाव्या भागात रोजा ठेवण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या आहाराला “सहरी’ असे म्हणतात. अरबी शब्द “सुहूर’ या मूळ शब्दापासून आपल्याकडे “सहरी’ हा शब्द प्रचलित झाला. अनेक दैनिकांतून मथळ्याच्या ठिकाणी आजचा इफ्तार आणि उद्याची सहरी असे ठळक लिहून त्यापुढे त्या-त्या वेळा लिहिलेल्या असतात. म्हणजेच सूर्याेदयाच्या आधी दिलेल्या वेळेपर्यंतच काही खाता-पिता येते. दिलेल्या वेळेनंतर एक मिनिटही काही खाता-पिता येत नाही. हदीसमध्ये “सहरी’ला “अल-फलाह’ असेही म्हटले आहे. हदीस म्हणजे प्रेषित मुहंमद (स.) यांची वचने, त्यांच्या परंपरा किंवा त्यांची मते जी लिखित स्वरूपात आजही उपलब्ध आहेत.
“अल-फलाह’ या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यापैकी “अल-फलाह’ म्हणजे संरक्षण, स्थैर्य, यश, अस्तित्व, सफलता, सुटका, मुक्ती, मोक्ष असे विविध अर्थ आहेत. “अल-फलाह’ म्हणण्याचे कारण म्हणजे दिवसभराचा जो निर्जळी आणि अन्नाच्या कणाविना ठेवला जाणारा रोजा आहे त्यास सहरीचा आधार मिळू शकतो. रोजा ठेवण्यासाठी साहाय्य मिळते आणि रोजा ठेवण्यासाठी शारीरिक बळही मिळते. प्रेषित मुहंमद (स.) यांनी सहरीला “मंगलप्रद’ आहार म्हटले आहे. जर झोपेत असल्याने जाग न आल्यास किंवा सहरीची वेळ निघून गेल्यानंतर जाग आल्यास विनासहरीचा उपवास म्हणजे रोजा ठेवला जाऊ शकतो. पण सहरीला उठता आले नाही म्हणून रोजा सोडून देणे योग्य नाही. सहरी करणे बरकतीचे म्हणजे शुभ मानले जाते. खरे तर सहरी करणे ही सुद्धा पुण्याची बाब मानली जाते. सहरी केल्याने म्हणजे रोजा ठेवण्यासाठी पहाटे घेतलेल्या आहाराने पुण्य प्राप्त होते. इतर उपासना केल्याने जसे नमाज पढल्याने, रोजे ठेवल्याने, दान-धर्म केल्याने जसे पुण्य प्राप्त होते तसेच सहरी केल्यानेही पुण्य प्राप्त होते. कारण सहरी करणे म्हणजे केवळ आहार घेणे नसून अल्लाहच्या आज्ञेचे पालन करणेही आहे. जर अल्लाहने एखादी गोष्ट करण्यास मनाई केलेली असेल आणि ती केली तर आपण पाप करतो. तर त्याने दिलेल्या आज्ञांचे पालन कले तर पुण्यही लाभते.
प्रेषित मुहंमद (स.) यांनी म्हटले आहे, “सहरीच्या न्याहरीद्वारे तुम्ही दिवसाच्या उपवासावर (रोजा) आणि वामकुक्षीद्वारे उत्तररात्रीच्या व तरावीहच्या वेळी पढल्या जाणाऱ्या नमाजवर सवलत प्राप्त करा’. सहरी करणे जरूरी असले तरी आपल्याला सवय नसल्याने पहाटे साडेतीन किंवा चार वाजता झोपेतून उठून खाणे-पिणे अवघड असते. तरीसुद्धा रोजाधारक पहाटे उठून थोडाफार आहार घेतातच. सहरीमध्ये आपल्याला आवडेल ते खाण्याची मुभा असते. अनेकदा असे म्हटले जाते की, मुस्लिमांच्या रोजामध्ये पहाटे उठून पोटभर खातात आणि रात्री पुन्हा खातात, मग कसला आला उपवास? परंतू एक गोष्ट मात्र आपण शास्त्रीयदृष्ट्या समजून घेतली पाहिजे ती म्हणजे कुणीही जे काही खातो किंवा पितो ते जठरामध्ये फार काळ राहत नाही. तीन तासानंतर आपण खाल्लेले किंवा प्यालेले जठरात काहीच उरत नाही. पचनसंस्थेद्वारे ते अन्न पचण्यासाठी पुढे आतड्यात ढकलले जाते. त्यामुळे चार किंवा सव्वाचारपर्यंत घेतलेला पहाटेचा आहार सकाळी सात, सव्वा सातपर्यंत पोटात काहीच उरत नाही. ते रिकामे होते. सकाळच्या सात वाजल्यापासून सायंकाळी सात सव्वासात म्हणजे रोजा सोडेपर्यंत पोटात म्हणजे जठरात काहीच नसते. तरीसुद्धा सहरी मात्र रोजाधारकास शारिरीक बळ आणि शक्ती प्राप्त करून देते. खरेतर सहरीमुळे रोजा ठेवायला शक्ती मिळणेच अभिप्रेत आहे.
“क्षितिजावर जेव्हा रात्रीच्या काळ्या रेषेवर पांढरी रेषा उमटू लागते त्यावेळी समजा की सहरीची वेळ संपलेली आहे’ असे पवित्र कुरआनमध्ये सहरीच्या वेळेबद्दल म्हटले आहे. आपल्याकडे मशिदी मशिदीतून सहरीची वेळ संपत आल्याची आणि संपल्याची घोषणा करण्यात येते. काही शहरातून सहरीची वेळ संपताच आजान सुरू होते .

वेळ संपल्यानंतर मात्र काहीही खाता-िपता येत नाही. सहरीचे पुण्य कमावण्यासाठी रोजाधारकांना पहाटे उठावेच लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *