जरांगे वाचले आणि मौलाना फसले..?

जरांगे वाचले आणि मौलाना फसले..?

हा प्रश्न विचारताच अनेकांनी तोंडसुख घेणे सुरू केले. मौलाना सज्जाद नोमानी मुस्लिम समाजातील धार्मिक नाव. मूळचे लखनऊ उत्तरप्रदेशचे असलेले मौलाना सज्जाद नोमानी यांनी महाराष्ट्राच्या मुस्लिमांसाठी धार्मिक – अध्यात्मिक क्षेत्रात भरीव असं योगदान दिलं आहे. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या घराचा त्याग, समर्पण ह्या गोष्टी केल्या आहेत.

एरव्ही मुस्लिमांना आधुनिक शिक्षण द्या म्हणून बोंबलणारी मंडळी यांनी एक लक्षात घ्या मदरशात याच मौलाना यांनी धार्मिक शिक्षणाबरोबर आधुनिक शिक्षणाची सूरवात केली. उघड आव्हान देऊ शकतो मौलाना यांच्या कोणत्याही इयत्तेत शिकणारा मुलगा महाराष्ट्रातील इतर शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा उजवा ठरेल.

बामसेफची सामाजिक पार्श्वभूमी असणारे मौलाना काही काळात बामसेफ पासून दुरावले. मौलाना लोग ‘राजनीती मस्जिद के बाहर ‘ किंवा राजकारणाला आजपर्यत मस्जिद पासून दूर ठेवत आलेत याबाबत नवशिक्षित मुस्लिम तरुणांमध्ये एक आवाज निघायचा पैगंबरांनी राजकारण, समाजकारण, अर्थकारण मस्जिदच्या मेंबर वरून केले आजचे मौलाना आम्हाला कुठपर्यंत जमिनीच्या वरच्या आणि जमिनीच्या खालच्या गोष्टी सांगणार? आजच्या परिस्थितीला मौलाना जबाबदार आहेत?

मौलाना सज्जाद नोमानी यांची प्रवचन बघा ते कधीही इतर धर्मावर टिका टिपण करता दिसत नाही. सुफी च्या रचनेवर आधारित त्यांचा खानखाह चालतो.

गेल्या काही दिवसांत भाजपा पक्षाबाबत मराठा समाजामध्ये प्रचंड रोष आहे. दलित, शेतकरी यांच्या बाबतीत भाजपा पूर्णपणे अपयशी ठरली आहे तसेच इतर मुद्द्यावर सरकारकडे सांगण्यास काहीही उरले नाही. फोडाफोडीच राजकारण आणि गुजरात धार्जिनी उद्योग भूमिका यामुळे महाराष्ट्र जनतेचा रोष खूप आहे.

लोकसभेला निवडणुकीला हिंदू मुस्लिम अजेंडा त्यांना यशस्वी करता आला नाही त्यामुळे त्याचे नुकसान पक्षाला झाले.

निवडणुकीच्या सुरवातीलापासुन ‘ वोट जिहाद ‘ चा मुद्दा देखील म्हणावा असा काम करत नव्हता.

जरांगे हे एक सामान्य आंदोलक ते आज एक समाजाचा चेहरा बनले आहेत. समाजामध्ये काम करत असताना आपला प्रामाणिक हेतू समाजाचं भल व्हावं हा असतो.
जरांगे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तेव्हा आत्तापर्यंत ‘ आम्ही जे काही करतोय ते समाजासाठी करतोय ‘ म्हणणारे हौसे तिकीट मिळावे पाठिंबा मिळावा म्हणून येरा जारा घालत होते.

समजा जरांगे यांनी आपले उमेदवार जाहीर केले असते तर… नाराज गटाची संख्या मोठी असती. नाराज झालेल्या उमेदवारांनी दिलेल्या उमेदवारापेक्षा ‘आम्ही किती समाजासाठी त्याग केला ‘ म्हणून जरांगेवर उमेदवार जाहीर करण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला असता… किंवा महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असता तर ‘ जरांगे पाटील शरद पवारांचे बगलबच्चे ‘ म्हणून बोंब भाजपा महायुतीने उठवली असती जी बोंब मौलाना सज्जाद नोमानी यांच्याबाबत ‘ वोट जिहाद, मौलाना का फतवा ‘ म्हणून उठवत आहेत.

भारतातील कुरेशी समाजाची सगळ्यात मोठी संघटना या संघटनेने भाजपा आमदार आशीष शेलार यांचे समर्थन केले आहे. सांगलीत एक मौलाना गोपीचंद पडळकर यांना निवडून आणण्यासाठी धावपळ करत आहेत. अहमदनगर मध्ये विखेंच्या सभेत तेथील जमातचे मुखिया विखेंना मतदान करा म्हणून सांगतात.

महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाने अनेक अन्याय सहन केले आहेत. मराठी मुस्लिमांचे प्रतिनिधित्व नेहमी नाकारले गेले. महाविकास आघाडीने मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. त्यामध्ये अजित दादा गट आणि शरद पवार गट असे उमेदवार एकमेकांसमोर आहेत. सरळ पाठिंब्याने अजितदादा गटाचे उमेदवार नाराज तर होणार पण मुस्लीमांच्यात संभ्रम होऊन तिसरा उमेदवार निवडून येऊ शकतो?

AIMIM आणि समाजवादी पार्टी यांच्यात सत्तेच्या हव्यासापायी जो शीतयुद्ध सुरू होते त्याचा भडका मौलाना यांच्या यादीने उडाला. बालिश पोरकट पोरांनी देखील मौलाना यांच्यावर घाणेरडे आरोप सुरू केले. मौलाना यांचे तर्क समर्थन करण्यामागे वेगळे असतील?
उद्या महाविकास आघाडी सत्तेत आली तर समाजवादी पार्टीला मंत्रिमंडळात स्थान मिळेल त्यांचे उमेदवार जास्त असतील तर…? गेल्या वेळी AIMIM आणि समाजवादी पार्टी यांनी जरी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला तरी AIMIM ला सत्तेत वाटा मिळेल? त्याचा परिणाम कितपत उमेदवार निवडून आलेल्या मुस्लिम बहुल भागातील विकासावर होईल?

शिवाय त्यांनी समर्थन केलेल्या उमेदवारांवरून उत्तरभारतीय राजकारण मजबूत करण्याकडे वाटचाल सुरू असल्याचे त्यांच्यावर आरोप झाले ते वेगळे.

मतदार हा शिया, सुन्नी, तब्लिग, बरेलवी, अहले हदिस असा असतो हे मौलाना विसरले. मौलाना यांच्या गफ्फार कादरी यांच्या समर्थनानंतर मौलाना अजहरी यांच्या इम्तियाज जलील यांचे समर्थन केल्याच्या पोस्ट फिरू लागल्या.

मीडियातून मौलाना यांनी हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असल्याचे जाहीर केले तरी त्यांना मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, जमियत यांच्याशी जोडले गेले.

देशामध्ये मुस्लिम समाजाबद्दल रोज द्वेषपूर्ण घटना घडत असताना त्यांची भूमिका योग्य आहे. कोणत्या मुस्लिमाने भाजपचे समर्थन का आणि कशासाठी करावे? भाजपाने मुस्लिमांना कितपत प्रतिनिधित्व दिले आहे? महाराष्ट्रात रोज मुस्लिमांच्याबाबत हल्ले होत असताना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कितपत यशस्वी झाली आहे?

महाराष्ट्रातील एवढा मोठा धनगर समाज असताना एक प्रतिनिधी लोकसभेवर निवडून गेला नाही किंवा आजपर्यत मुख्यमंत्री झाला नाही. धनगर आरक्षणाचे घोगडे भिजत आहे ते वेगळे. त्यांनी उद्या भाजपाचा विरोध केला तर वावगे काय आहे? भाजपाच्या कित्येक उमेदवारांचे तेथील मुस्लिम स्थानिक पातळीवर समर्थन करतात व निवडून आणतात. कधी नागपूर मध्ये गडकरी यांना मिळणाऱ्या मुस्लिम मतांची टक्केवारी काढा.

तीन टक्के महाराष्ट्रात असलेला ब्राह्मण समाज भाजपाने त्यांचे आठ उमेदवार दिलेत आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा समाजातील दिलाय म्हणून त्यांचं उघड समर्थन करतो.

एका मुस्लिम समाजातील सामाजिक धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीने जो सुज्ञ आहे ज्याला परिस्थितीची जाण आहे तो कोणत्या मुद्द्यावर भाजपचे समर्थन करेल?

अजितदादा गटाच्या पाठिंब्याने अजित दादा आणि त्यांना मानणारे मुस्लिम हे अजितदादाच्या राष्ट्रवादीच्या रूपाने आपली मते भाजपाच्या पारड्यात टाकत असतील तर त्यांना सावध करणे मौलाना यांच्या दृष्टीने योग्य वाटले असेल पण जे शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या गटातील कट्टर हिंदुत्ववादी ज्यांचा मुस्लिमांना कधीना कधी त्रास झाला आहे त्यांचे समर्थन हे मुस्लिमांना न कळण्यापलीकडे आहे पण त्या गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची कोरोना काळातील मुस्लिमांवरती सगळीकडून हल्ले होत असताना प्रेमाची, आपुलकीची भूमिका आणि कृती हि मौलाना यांना महाविकास आघाडीसाठी फायद्याची आश्वासक वाटली असावी.

उद्या AIMIM चे सगळीकडे समर्थन केले असते तर ‘ वोट जिहाद ‘ च्या मुद्द्याचा प्रचार मराठवाड्यात भाजपासारख्या पक्षाला महाविकास आघाडीच्या हक्काच्या मतदार यांच्यामध्ये करणे सोप्पे झाले असते.

कोणी एकाने घेतलेल्या राजकीय भूमिकेचे समर्थन करणारा कोणताही समाज ह्या पृथ्वीतलावर नाही. येथे सत्तेच्या आश्रयाने आपल्याला टेंडर मिळतील, फायदा होईल असा एक वर्ग समाजात असतो.

सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळी यांनी एक भूमिका घेणे जिकरीचे असते. मौलाना यांनी समाजासाठी ते धाडस केले आणि समाजातील लोकांचा रोष पत्करून घेतला.

मराठी मुस्लिमांचे देखील प्रश्न आहेत. शिक्षण, आरक्षण, संरक्षण, आर्थिक सक्षमीकरण हे मुद्दे बाजूला ठेवून भाजप सत्तेत येईल हि भीती दाखवली जाईल.

उद्या भाजपाच्या, हिंदुत्वाच्या प्रचारासाठी पुजारी, धार्मिक नेते समोर येतील. मुस्लिमांची भीती दाखवून , मौलाना यांनी ज्यांचे समर्थन केले आहे त्यापैकी 265 हिंदू आहेत हे न सांगता आम्ही हिंदुत्वाचे तारणहार, आम्ही मुस्लिमांची टाईट केली या अभिर्भावात ‘ धर्मयुद्धाचा ‘ नारा देऊन शेतकरी, कामगार, महागाई हे मुद्दे पिछाडीवर टाकेल. सगळ्यात जास्त ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात ते सगळे हिंदू होते. नोकरी नाही, उद्योग नाही म्हणून आत्महत्या करणारे हे सगळे हिंदू आहेत हे विसरले जाईल? येणाऱ्या दिवसात सोशल मिडिया, प्रसारमाध्यमे , प्रचार यंत्रणा यामधून विषारी प्रचार केला जाईल कदाचित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडवणीस होतील.

निवडणूक हि ‘ वोट जिहाद ‘ आणि ‘ वोट धर्मयुद्ध ‘ याचा आखाडा होऊन राजकीय चिखल होईल.

जरांगे यांनी यादी जाहीर केली असती तर या निवडणुकीला मराठा विरुद्ध ओबीसी हा रंग देऊन मराठा आरक्षण, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी जी गेल्या दहा वर्षात झळ बसत आहे ते मुद्दे एका झटक्यात बाजूला होऊन राजकीय कोंबड्याच्या झुंज झाल्या असत्या.

यामुळे जरांगे वाचले मौलाना फसले?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *